पुतळ्यांचं राजकारण नेमकं काय? आपण पुतळ्यांना इतकं महत्त्व का देतो? BBC News Marathi
२०२४ अगस्ट ३१ · १९ मिनेट
सोमवार 26 ऑगस्ट, 2024 रोजी संपूर्ण कोकणात जोरदार वाऱ्यासह पाऊस सरू होता, तेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणइथल्या राजकोट किल्ल्यावर उभा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या 28 फूट उंच पुतळ्याचं अवघ्या 9 महिन्यांपूर्वी, म्हणजे डिसेंबर 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण झालं होतं. त्यामुळे त्यावरून राग आणि संताप राज्यभरात व्यक्त करण्यात आला. पुतळा बांधतांना निकष पाळले गेले नाही, भ्रष्टाचार झाला, असे आरोप विरोधी पक्षांनी केले, तर सत्ताधाऱ्यांना यासाठी माफी मागावी लागली. मात्र पुतळा पडल्याने अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या. याच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले. काही आठवड्यांआधीच शेजारी बांगलादेशात मात्र आणखी एक पुतळा पडला, बहुदा पाडण्यात आला होता. तो होता शेख मुजीबूर रहमान यांचा, जे बांगलादेशचे राष्ट्रपिता मानले जातात. बांगलादेशातल्या कोटाविरोधी आंदोलनाने हिंसक वळण घेतलं, पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून जावं लागलं, आणि त्यानंतर त्यांच्या वडिलांच्या पुतळ्याची अशीच नासधूस करण्यात आली. पण पुतळेच का? कुठल्याही संस्कृतीत हे निर्जीव, मुके पुतळे इतके महत्त्वाचे का असतात? एखाद्या ठिकाणी पुतळा का उभारला जातो? किंवा कुठल्याही आंदोलनादरम्यान, क्रांतीदरम्यान पुतळे का पाडले जातात? आज गोष्ट दुनियेची ऐकताना याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - तिलक राज भाटिया